*भू-अलंकरण:रांगोळी*

भू-अलंकरण दिवस २२'एप्रिल.

         *भू-अलंकरण:रांगोळी*

              

             *आनंदाचा सण*

            *दिवाळी दिवाळी*

             *रंगरंगांची उधळण*

                 *अशी ही*

              *रांगोळी रांगोळी...*


आनंद, चैतन्य, उत्साह, जल्लोष, आतिषबाजी व रोषणाई यांचा मेळ घालणारा सण म्हणजे दिवाळी!! आजूबाजूचा परिसर दिव्यांच्या आणि रोषणाईच्या प्रकाशात उजळून निघत असताना सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ती लक्ष्मीच्या स्वागतासाठी प्रत्येक दारासमोर घातलेली रंगांत रंगलेली आकर्षक रांगोळी!

रांगोळी म्हणजे भू-अलंकरण!

जमिनीवर केलेले सुशोभन! संस्कृतमध्ये रांगोळीला रंगवल्ली म्हणतात म्हणजे रंगांच्या रेखाटलेल्या ओळी! विविध साहित्यांचा वापर करून जमिनीवर काढलेली चित्रे, आकृत्या म्हणजे रांगोळी! रांगोळी म्हणजे बोटांच्या चिमटीतून, पांढरे शुभ्र चूर्ण जमिनीवर सोडून,त्यात आकर्षक रंग भरून चितारलेली नयनरम्य आकृती!

 रांगोळी ही मांगल्याचे, पावित्र्याचे, प्रसन्नतेचं प्रतीक! "घराची कळा अंगण सांगे" या उक्तीप्रमाणे, घराच्या अंगणात सडासंमार्जन करून सारवलेल्या जमिनीवर घातलेल्या रांगोळीवरून त्या घराची शुद्धता, स्वच्छता, पवित्रता, ऐश्वर्य, समृद्धी आणि घरातील महालक्ष्मीचा वास प्रकट होतो. प्रत्येक स्त्री ही आपल्या उपजत गुणांनुसार रांगोळीत आपले कलाविष्कार साकारत असते. रांगोळी घालणारी स्त्री म्हणजे साक्षात महालक्ष्मी!! रांगोळी घालतांना तिच्यात अध्यात्मिक प्रसन्नता निर्माण होत असते.

 रांगोळी ही चौसष्ट कलांपैकी एक. मूर्तिकला, चित्रकलेपेक्षाही प्राचीन. रांगोळीचा उल्लेख वेदांमध्ये आढळतो. आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच पारशी धर्मातही रांगोळी शुभसूचक मानली जाते. रांगोळीला अल्पना असेही म्हणतात. अल्पना म्हणजे आलेपन-लेप करणे. प्राचीन काळी असा विश्वास होता की कलात्मक चित्रे घरात काढली की घर,धनधान्य सुरक्षित राहते. रांगोळी ही केवळ सजावटीची गोष्ट नसून , रांगोळीतून येणाऱ्या सात्विक लहरींनी सकारात्मक वातावरण तयार होत असते. अंगणात, उंबरठयावर, देवघरात, तुळशीवृंदावना समोर रोज रांगोळ्या घातल्या जातात. तसेच लग्नसमारंभ, सण-उत्सव, कुळाचार प्रसंगी मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात. 

 रांगोळी ही आकृतीप्रधान व वल्लरीप्रधान प्रकारात घातली जाते. आकृतीप्रधान रांगोळीमध्ये भौमितिक आकृत्या काढल्या जातात तर वल्लरीप्रधान मध्ये पाने, फुले, कुंदन इ. चा वापर केला जातो. रांगोळीसाठी तांदळाचे पीठ, भाताची फोलपटे, संगमरवर-गारगोटी- डोलेमाईट दगडाचे चूर्ण, धान्य, पाने-फुले, विटांची पूड, हळद-कुंकू, वाळू, गुलाल इ.चा वापर करून प्रतिकात्मक आकृत्या काढल्या जातात. येणाऱ्या नवीन वर्षात घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण या विशेष रांगोळी प्रकारात मांगल्यसुचक शुभचिन्हे, सूर्य-चंद्र-तारे, विविध देवता, आयुधे, पाळणा, गोपद्म इ.प्रतीके अध्यात्मिक अनुभूती देतात.  आशयसंपन्न प्रतिकांतून  विचारांचे व भावभावनांचे सौंदर्य  अधोरेखित करणे हाच रांगोळीचा मुख्य हेतू!

महाराष्ट्रात ठिपक्यांची रांगोळी या पारंपरिक प्रकारासोबतच आता संस्कारभारतीचीही रांगोळी खूप प्रसिद्ध आहे. चाळणीच्या सहाय्याने रंग भरून, त्यावर पाच बोटांच्या सहाय्याने  सफेद रांगोळीने आकृत्या काढल्या जातात.  पाण्यावरची रांगोळी हा अजून एक लक्षवेधक प्रकार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी फुलांची रांगोळी हा उत्तम पर्याय आहे. ताटाभोवती फुलांची महिरप काढली जाते. पोर्टेट रांगोळीत प्रसिद्ध व्यक्तींची अगदी हुबेहुन रांगोळीचित्रे साकारली जातात.ताटाभोवती, उंबरठ्यावर, यज्ञाच्या वेदीभोवती बॉर्डर रांगोळी घातली जाते. फेव्हीकॉल मध्ये रंग मिसळून तसेच तेलाच्या रंगाने दारात कायमस्वरूपी रांगोळी घालता येते.

रांगोळी आकृत्या काढण्यासाठी हल्ली बाजारात छाप,पेन इ. साधने उपलब्ध आहेत. महिलांसोबत आता पुरुषही रांगोळीप्रकारात पारंगत आहेत. रांगोळीकलाकार म्हणून व्यवसाय करत आहेत. विविध स्पर्धा,प्रदर्शन यांतून रांगोळी कलाकारांना उत्तेजन देऊन सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न होत आहे. प्रदर्शनामध्ये वास्तवदर्शी व्यक्तिचित्रे, पर्यावरण, सामाजिक विषयांवर आधारित मुक्तहस्त रांगोळ्या चितारल्या जातात.

 इतर कलांच्या तुलनेत रांगोळी ही लोककला काळाप्रमाणे बदलत असून अजून समृध्द होत आहे. घरच्या दारातली रांगोळी आता सातासमुद्रापार पोहचली आहे.

 हा रांगोळीचा महिमा पुर्वापार चालत आलेला आहे. असे हे..

      *रांगोळीच्या कलेचे वैभव*

   *असेच सर्वत्र जगभर पसरावे..*

     *हिंदू संस्कृतीच्या पताकेने*

   *चहू दिशांत उंच उंच फडकावे..*

रांगोळी : रांगोळीतून अष्टविनायक

रांगोळी

मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक विभाग आयोजीत दुसऱ्या रांगोळी प्रशिक्षण शिबिराला २८ जानेवारी पासून सुरुवात झालेल्या ५ फेब्रुवारीला यशस्वी सांगता झाली.  सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी या शिबिराचे आयोजन केले होते, यात २५ जणांचीच बॅच झाली.


सर्वांनी शिबिराचा पहिला दिवस खूप एन्जॉय केला. सर्वांची रांगोळीची आवड आणि मेहनत दिसत होती. शिबिराची सुरुवात, मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री.अरूणजी चव्हाण, कार्याध्यक्ष मा.श्री.महेशजी चव्हाण,कार्यकारिणी सदस्य श्री.ज्ञानेश्वरजी भालेराव, श्री.अजयजी माने, सांस्कृतीक प्रमुख सौ.रश्मी राणे, महीला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.


सौ.करुणा सावंत यांनी आपल्या भारतीय परंपरेतील रांगोळीचे महत्त्व सांगितले. मा.अरूणजी चव्हाण, मा.महेशजी चव्हाण,सौ.माधुरी तळेकर,सौ.रश्मी राणे व सौ ऐश्वर्या ब्रीद यांनी आपले मनोगत मांडले. सौ. करूणा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.चहापानानंतर प्रशिक्षणाची सर्व सूत्रं सौ.ऐश्वर्या यांनी घेतली. त्यांना करुणा यांनी उत्तम साथ दिली. नाव नोंदणीची जबाबदारी सौ.मनीषा साळवी आणि सौ.मानसी म्हामुणकर यांनी उत्तमरित्या पार पाडली.


या शिबिरासाठी लागणारे ४० किलो रंग आणि ५० किलो सफेद रांगोळी बाजारातून आणण्यापासून ते सर्व सामान प्रत्येकी १ किलो पॅकिंग करण्यापासून सौ. ऐश्वर्या ब्रीद यांना गणेशभाऊ,परब मामा,भुवड मामा,राजेश भाऊ,पिल्ले मामा यांची खूप मदत झाली. प्रवेशद्वारावरील सुंदर रांगोळी सौ. करूणा सावंत यांनी घातली.


पहिल्या दिवशी उपाध्यक्ष मा.श्री. सुदामजी म्हामुणकर,कोषाध्यक्ष मा.श्री.प्रमोदजी देसाई, सौ.मिनल सावंत, सौ.वृंदा शिर्के यांनी शिबिराला भेट दिली. 

अध्यक्ष मा.श्री.शिर्के काका यांचे मार्गदर्शन,सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ यांचे प्रोत्साहन आणि सर्व उपसमिती सदस्य यांचे सहकार्य यांमुळे आपले शिबिर यशस्वी होणारच.