*उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम होते का आणि ते का?*

*उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम होते का आणि ते का?*


तुमच्या घरात किंवा कार्यालयात सोबतच्या स्त्रिया  "किती उकडतंय, किती गरम होतंय, पंख्याचा वारा लागतच नाही, एसी लावा, एसी चे तापमान कमी करा..." वगैरे तक्रारी करत असतील तर त्यांमागे तथ्य आहे, स्त्रिया उगाच तसं बोलत नसतात.

सभोवतालच्या उष्ण तापमानाचा आरोग्यावर होणारा बरा- वाईट परिणाम अभ्यासताना असे दिसून येते की पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्री-शरीरावर उष्ण तापमान अधिक विपरित परिणाम करते.स्त्रियांवर उच्च तापमानाचा अधिक वाईट परिणाम का होतो,त्याचे स्पष्टीकरण देताना जो महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो असा.

पुरुष आणि स्त्रियांच्या पेहरावामध्ये-कपड्यामध्ये असणारा फ़रक हे स्त्रियांच्या शरीरावर उष्णतेचा अधिक परिणाम होण्याचे मुख्य कारण असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्यातही भारतासारख्या ज्या देशांमध्ये  स्त्री-शरीर अधिकाधिक झाकले जाईल असे कपडे घालण्याचा रिवाज आहे, तिथल्या स्त्रियांनी एकावर एक घातलेले अंगावरचे कपडे,(त्यात पुन्हा आधुनिक काळात हवेचे अजिबात आवान गमन (व्हेंटीलेशन) होऊ न देणारी जीन्स) आणि त्याखालील अन्तर्वस्त्रे यांमुळे शरीरा ला वारा लागत नाही आणि आतली उष्णता आतल्या आतच वाढत जाते.संपूर्ण शरीर झाकलेल्या कपड्यांमुळे  बाह्य त्वचेला घाम निर्माण करून शरीराला थंड करण्याचा उपाय सुद्धा करता येत नाही (जिन्स मुळे तर अधिकच) त्यात पुन्हा स्वयंपाकघरात उष्णतेजवळ सरासरी दोन ते चार तास काम केल्यामुळे  वाढणाऱ्या उष्म्यामुळे स्त्रियांचे शरीर अधिकच उष्ण होत जाते, जे विविध उष्णता जन्य विकारांना बळी पडू शकते.

उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम का होते, यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे.शास्त्रीय कारणाचा विचार करता स्त्रियांच्या शरीरामध्ये त्वचेखाली असणारी अधिकची चरबी  त्याला जबाबदार असल्याचे लक्षात येते. त्वचेखाली अधिक मात्रेमध्ये असणार्‍या  चरबीमुळे स्त्री-शरीराला  सौष्ठव व  सौंदर्य प्राप्त होते.हीच चरबी स्त्रियांच्या शरीराला अधिक ऊब देते. ऊब देण्याचा चरबीचा हा गुण  हिवाळ्यात उपकारक सिद्ध होत असला तरी उन्हाळ्यात मात्र शरीराला सहजी थंड होऊ देत नाही व स्त्री-शरीर उन्हाळ्यामध्ये तुलनेने अधिक गरम राहते.

एकंदरच उन्हाळ्याचा आणि उष्ण तापमानाचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती विपरित परिणाम  होत असेल, याची पुरुषांना कल्पना सुद्धा करता येणार  नाही.मात्र त्याची कल्पना करुन, त्यामागील कारणे ओळखून त्यामध्ये बदल व्हायला हवा.

संस्कृतीला धक्का न लावता स्त्रियांना हवेशीर कपडे कसे मिळतील याची काळजी घ्यायला हवी. स्वयंपाकघरातली उष्णता कशी वाहून जाईल व स्वयंपाकघर कसे हवेशीर होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवे.महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी घरातल्या प्रत्येक सदस्याने उचलायला हवी.घरातल्या सर्वांच्या  उदरभरणासाठी अन्न तयार करणे, ही काही एकट्या स्त्रीची जबाबदारी नाही.

स्त्रियांनी सुद्धा पाणी व अन्य द्रवपदार्थ (चहा, कॉफी, मद्य वगळून) पित राहावं. केवळ दहा बारा ग्लास पाणी पिऊन चालत नाही, शरीरातून घटलेले क्षार व उर्जा मिळायला हवी. दिवसातून निदान एक शहाळ्याचे पाणी प्यावे. पाणी व थंडावा देणाऱ्या फळांचे सेवन करावे, जसे केळं, कलिंगड, काकडी, टरबूज, द्राक्ष,पेरू, वगैरे. दिवसातून एक तरी फळांचा रस प्यावा.

वैद्य अश्विन सावंत

Shashwat Ayurvedic Clinic

Mulund.